जिल्ह्यातील २० टक्के मागासवर्गीय तर पाच टक्के दिव्यांग लाभार्थीना यंदा समाजकल्याण विभागाकडून विविध साहित्य व योजनांचा लाभ दिला जाणार आहे. एससी, एसटी व व्हिजेएनटी प्रवर्गातील लाभार्थीनाच समाजकल्याण विभागाकडून योजनांचा लाभ मिळतो. त्यामध्ये एक लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेले लाभार्थीच या योजनांसाठी अर्ज करू शकतात. या प्रवर्गातील आठवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना जिल्ह्यातील ७० कॉम्प्युटर सेंटरवर मोफत ‘एमएस- सीआयटी’ तर दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना टॅली करण्याची संधी दिली जाते.
त्यासाठी प्रतिविद्यार्थी सव्वाचार ते साडेचार हजार रुपये केंद्र चालकांना दिले जातात. शाळांच्या मुख्याध्यापकांनी त्यासाठीचे अर्ज करणे अपेक्षित आहेत. तसेच दूर अंतरावरून शाळेला ये-जा करणाऱ्या मुला-मुलींसाठी (एससी, एसटी, व्हिजेएनटी प्रवर्गातील फक्त) मोफत सायकली देखील दिल्या जाणार आहेत. त्यासाठी ऑक्टोबरपर्यंत अर्ज करावा लागणार आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी समाजकल्याण अधिकारी अमोल जाधव यांच्या नेतृत्वात योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे.
दिव्यांगांना यंदा पहिल्यांदाच ई-रिक्षा
दिव्यांग लाभार्थीना यंदा पहिल्यांदाच जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून ई-रिक्षा दिल्या जाणार आहेत. त्यासाठी ६० लाख रुपयांचे बजेट असून त्यासंबंधीची निविदा काढण्याची तयारी सुरू झाली आहे. ज्यांच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना आहे, ४० टक्के दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र आहे अशांनाच ई-रिक्षाचा लाभ मिळणार आहे. यासाठीही एक लाखांच्या वार्षिक उत्पन्नाची अट आहे. अडीच ते तीन लाखांपर्यंत एका ई-रिक्षाची किंमत आहे. तसेच एससी, एसटी, व्हिजेएनटी प्रवर्गातील गरजूंना ५० हजार रुपयांची झेरॉक्स मशिन देखील मिळणार आहेत.
शेतकऱ्यांना शेळीगट अन् कडबाकुट्टी, विद्युतपंपही
मागील तीन वर्षात एकदाही समाजकल्याण विभागाच्या योजनेचा लाभ न घेतलेल्या एससी, एसटी, व्हिजेएनटी या प्रवर्गातील लाभार्थीना (वार्षिक उत्पन्न एक लाखांपर्यंत) शेळीगट मिळतो. त्यात चार शेळ्या व एका बोकडाचा समावेश असतो आणि त्यासाठी ‘समाजकल्याण’कडून ४२ हजार रुपये दिले जातात. पण, संबंधित लाभार्थीनी त्याची खरेदी करून पावती दिल्यास ग्रामसेवक किंवा विस्ताराधिकाऱ्यांकडून पाहणी होते आणि मग लाभार्थीच्या खात्यात रक्कम वितरित केली जाते. याशिवाय सातबारा उतारा, लाईटबिल जोडून अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना पाच एचपीची विद्युतपंप (२५ हजार रुपये किंमत) देखील दिला जातो. ज्यांच्याकडे जनावरे आहेत, त्यांना कडबाकुट्टी पण दिली जाणार आहे.
Post a Comment